मुंबई – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर औरंगाबादमध्ये ३१ मार्चपासून लॉकडाऊन लागणार होता. परंतु, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द करत असल्याची घोषणा केली. हा निर्णय जाहीर होताच एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी त्यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावर मनसे नेते अमेय खोपकर यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमेय खोपकर म्हणाले कि, एआयएमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमध्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाझ जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढतेय, परिस्थिती गंभीर आहे असं असताना असा जल्लोष करताना, नाचताना शरम वाटायला पाहिजे. हा तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी टीका त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर केली आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 31, 2021
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयाला इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला होता. यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती.