मुंबई – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मार्च रोजी 4 महिने पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने दिनांक 26 मार्च 2021 रोजी भारत बंदची हाक दिली असून या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. याबाबतचे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोशल माध्यमांवर प्रसिध्द करण्यात आले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, ‘संयुक्त किसान मोर्चा’ या बॅनरखाली देशातील 500 पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दिल्लीच्या सीमेवर शांततामय मार्गाने केंद्र सरकारने केलेले काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आंदोलन करत आहेत. आतापर्यंतच्या या आंदोलनात जवळपास 300 हून अधिक शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत.
केंद्र सरकारने केलेले काळे कृषी कायदे,इंधन दरवाढ व कामगार कायद्यातील अन्यायकारक बदलांना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने दि. २६ मार्च २०२१ रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे.@Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks #BharatBandh pic.twitter.com/DOGvgNo62f
— NCP (@NCPspeaks) March 23, 2021
केंद्रातील भाजप सरकारने सार्वजनिक संपत्तीची विक्री करणारे जनविरोधी निर्णय घेतलेले आहेत. इंधन व गॅस सिलेंडरच्या झालेल्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत. या सर्व बाबींना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने दि. 26 मार्च 2021 रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
26 मार्च 2021 रोजीच्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला असून आपण जिल्हा, तालुका पातळीवर निर्धाराने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे.