मुंबई – भाजपाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल महोदयांची भेट घेऊन सरकार अस्थिर असल्याचा दावा केला. परंतु हे सरकार अस्थिर नसून खंबीर आहे. भाजपाच्या स्वप्नांची पूर्तता होत नसल्याने सरकार अस्थिर करण्याचे कटकारस्थान ते करत आहेत, असा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर केला आहे.
मागील 16-17 महिन्यांपासून राज्य सरकार टिकणार नसल्याचे भाजप सांगत होते. त्यानतंर आमदार फुटण्याची बातमी त्यांनी दिली. आता मागील दोन महिन्यांपासून ते राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करत आहेत. परंतु, जोपर्यंत पटलावर बहुमत आहे तोवर सरकार बरखास्त करता येत नाही, हा सुप्रिम कोर्टाचा स्पष्ट निर्णय असल्याचे नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले.
पुढे मंत्री मलिक म्हणाले की, रश्मी शुक्ला यांच्या बदल्यांच्या अहवालावर भाजपाकडून आरोप केला जातोय. मीडियाला पूर्ण अहवाल न देण्याचा खेळ भाजपाकडून होतोय. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांना बदल्यांची सर्व प्रक्रिया माहीत आहे. त्यामुळे हा अहवाल पूर्णपणे बेसलेस असल्याचे मलिक यांनी सांगितले.
या सर्व घटनेचा खुलासा कालच करण्यात आला आहे. भाजपाला सत्तेपासून वेगळ राहता येत नाही यासाठी अशा विविध प्रकारचा प्रयत्न ते करत असल्याचे देखील नवाब मलिक म्हणाले.