नवी दिल्ली – शिवसेना आणि भाजप गेली 25 वर्षे सहकारी आहेत. एकमेकांचे चांगले सोबती होते. मग आज असं काय बिनसलं की संसदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एवढी टीका करण्यात आली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण करत केंद्र सरकार यू टर्न सरकार असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशातील लोकशाही संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांची नावेही नव्हती त्यांना अचानक शुन्य प्रहरामध्ये बोलण्याची संधी मिळाली. आणि त्या नेत्यांनी फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर तोंडसूख घेतले. मात्र आम्हाला बोलण्याची संधी देखील मिळत नसून हा लोकशाही मार्गाने जाणाऱ्या पक्षाचा अपमान आहे, असे सांगत त्यांनी पंतप्रधान काय राष्ट्रवादी पक्षाबद्दल एकेकाळी किती छान बोलले होते. आता मात्र आम्हालाही वेलमध्ये जाऊन विरोध करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
दरम्यान अँटीलिया प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकारवर विरोधकांकडून टीकेचा भडीमार केला जात आहे. यातच मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे प्रकरणाला अजून हवा मिळाली. आता या प्रकरणाचे पडसाद संसदेतही उमटायला सुरुवात झाली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी अँटीलिया प्रकरण संसदेत मांडले. सोमवारी दोन्ही सभागृहात या प्रकरणावरुन जोरदार गोंधळ झाला. यावेळी गोंधळ वाढल्यानंतर शिवसेना खासदारांनी सभागृहातून वॉक आउट केला.
यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी राज्यसभेत हे प्रकरण मांडले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री वसूली करत आहेत आणि हे सर्व देश पाहत आहे. पण, लोकसभा अध्यक्षांनी याला रेकॉर्डवर न घेण्याचे निर्देश दिले.
अँटीलिया प्रकरणावर खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर सचिन वाझेंची पाठराखण करण्याचा आरोप लावला. त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेंना पोलीस सेवेत परत घेण्याची मागणी केली होती. 16 वर्षांपासून निलंबित असलेल्या व्यक्तीला परत घेण्याची मागणी उद्धव ठाकरे कशामुळे करत होते. त्यांना याचे खरे कारण सांगावे लागेल, असे त्या म्हणाल्या.