नवी दिल्ली – भारतात यंदा ऑक्टोबर महिन्यात आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसह येत्या काळात ते दखील करोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत असतानाही बीसीसीआयकडून विविध स्पर्धा व दौऱ्यांचे आयोजन केले जाणार आहे. आयपीएलसह या स्पर्धा देखील बीसीसीआयसाठी पैशांचे मशीन ठरणार आहेत त्यामुळेच बीसीसीआयची हाव कायम असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. पण त्यानंतर बीसीसीआय विश्वकरंडक स्पर्धेसह विविध स्पर्धांच्या आयोजनाची चाचपणी करत आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ तसेच खेळाडू आयपीएल, आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, इंग्लंड दौरा, दक्षिण आफ्रिका तसेच न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघाला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत पुरेसा सराव मिळावा यासाठी बीसीसीआय द्विपक्षीय टी-20 मालिकाही खेळवण्याचा विचार करत आहे. यासाठी बीसीसीआय दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व न्यूझीलंड क्रिकेट मंडळांशी वाटाघाटी करत आहे.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. बीसीसीआय या दोन्ही संघांविरुद्ध टी-20 मालिकेचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. वर्ल्डकपच्या आधी संघातील खेळाडूंनी हा प्रकार खेळावा असा बीसीसीआयचा होरा आहे. अद्याप याबाबत कोणतीही माहिती अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही.
आयपीएल स्पर्धा संपल्यावर भारतीय संघ इंग्लंडला जाणार असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेनंतर न्यूझीलंड भारतात कसोटी मालिका खेळणार आहे. तसेच भारतीय संघ डिसेंबर व जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी-20, एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.