नवी दिल्ली, दि. 21 – देशभरातील बटाट्याचे भाव आज मोठ्या प्रमाणावर कोसळले. अनेक ठिकाणी घाऊक विक्रीचा भाव हा पाच ते सहा रूपये किलो इतका झाल्याने शेतकऱ्यांचा धाबे मात्र दणाणले आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाने बटाट्याच्या किंमती विषयी दिलेल्या आकडेवारीनुसार उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजरात या ठिकाणच्या बाजारांमध्ये बटाट्याचे दर 50 टक्क्यांनी कोसळले आहेत.
अनेक ठिकाणी घाऊक बाजारात बटाट्याला 6 रूपयांपेक्षाहीं कमी भाव मिळाला आहे. गेल्या तीन वर्षात प्रथमच बटाटा उत्पादकांचे इतक्या कमी भावामुळे मोठे नुकसान होताना पहायला मिळाले आहे. एक वर्षापुर्वी बटाट्याचा सर्वात कमी दर हा 8 ते 9 रूपये किलो असा नोंदवला गेला होता. त्यानंतर तो काही ठिकाणच्या घाऊक बाजारात 10 रूपये ते 23 रूपये किलो या भावाने विकला गेला होता.
किरकोळ बाजारात आज बटाट्याचा दर दहा ते बारा रूपये इतका होता. त्यामुळे सामान्य ग्राहकांचे फावले असले तरी शेतकऱ्यांवर मात्र कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली. 20 मार्चच्या आकडेवारीनुसार अमृतसरला बटाट्याचा दर पाच रूपये किलो इतका होता तर तिकडे चेन्नाईत त्या दिवशी 17 रूपये किलो दराने बटाटा विकला गेला आहे. यंदा बटाट्याचे सर्वत्र मोठे उत्पादन झाल्याने हे भाव कोसळल्याचे सांगितले जात आहे.