तणावाची स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय
पुणे -कर्नाटकातील सीमाप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याहून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाडी सीमाभागापर्यंतच नेण्याची सूचना कर्मचाऱ्यांना दिली आहे. रविवारीदेखील स्वारगेटहून सुटलेल्या गाड्या सीमेपर्यंतच धावल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कर्नाटक सीमाभागात वादाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. कोल्हापूरमध्येदेखील बसस्थानकात गाडीवर दगडफेक झाली होती. त्यामुळे कोल्हापूर येथून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. त्यापाठोपाठ खबरदारीचा म्हणून स्वारगेट स्थानकातून कर्नाटककडे जाणाऱ्या एसटीच्या गाड्या सीमाभागापर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील दोन दिवसांपासून पुण्यातून जाणाऱ्या गाड्यांच्या कर्मचाऱ्यांच्या तणावाची स्थिती पाहून गाडीचा मार्ग ठरवावे, असे सांगितले होते. रविवारीदेखील स्वारगेटहून सुटणाऱ्या काही गाड्या कोल्हापूरपर्यंत धावल्या होत्या.
स्वारगेट स्थानकातून दररोज कर्नाटकातील बीदर, गुलबर्गा, गाणगापूर मार्गांवर बसेस धावतात. परंतु, तणावाची स्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटी बसेस सीमाभागापर्यंत न्याव्यात, अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.