अहमदाबाद – ऋषभ पंतने आपल्या खेळाने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. त्याला आता त्याच्या जबाबदारीची जाणिव झाली आहे. यामुळे त्याला खेळाचा आनंद लुटू द्या, असे आवाहन हिटमॅन रोहित शर्माने केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून पंत भरात आहे. त्याने सातत्याने सरस कामगिरी करताना टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. आता तो त्याच्या केळाच्या बाबतीत अत्यंत गंभीर आहे. त्याच्यावरील टीकेमुळे तो निराश झाला होता. मात्र, त्याला सूर गवसल्यामुळे भारतीय संघाला एक आक्रमक फलंदाज व सर्वोत्तम यष्टीरक्षक गवसला आहे. त्याला अशाच खेळीची आवश्कता होती. आता त्याचा आत्मविश्वास उंचावला असून आगामी काळातही तो संघासाठी सातत्यानेसरस कामगिरी करेल, असा विश्वासही रोहितने व्यक्त केला.
ऑस्ट्रेलिया आणि नंतर इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत ऐन मोक्याच्या क्षणी केलेल्या जबरदस्त खेळीमुळे पंत सध्या चर्चेत आहे. रोहितने पंतवर दबाव न आणण्याची विनंती केली आहे. पंतला जर त्याच्या मनाप्रमाणे खेळण्याची संधी दिली तर तो असाच दमदार कामगिरी करत राहील, असा विश्वासही रोहितने व्यक्त केला आहे.
आम्ही त्याला मनाप्रमाणे खेळण्याची मोकळीक दिली आहे. संघ व्यवस्थापन म्हणून आम्ही हे करण्यासाठी तयार आहोत. पंतला त्याच्या मनासारखे खेळू दे. तो सातत्याने सरस कामगिरी करताना दिसेल, असेही रोहितने सांगितले.