नवी दिल्ली – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार गुप्तदान घेउन कायदेच बदलून टाकते. बरे हे कायदेही अशा बेमालुमपणे बदलले जातात की गुप्तदान कोणी दिले आहे ते समजणारच नाही अशा शब्दांत एका चर्चेदरम्यान कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
एका वाहिनीवरील चर्चेदरम्यान त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र आज स्थिती अशी आहे की, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याची नोकरीच चालली जाते. भारतीय जनता पार्टीला आणि त्यांची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तर सुरूवातीपासूनच महिलांबाबत अडचण राहीलेली आहे.
सरकारचा विरोध म्हणजे देशद्रोह आणि सरकारचे समर्थन म्हणजे देशभक्ती अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. याचे उदाहरण देताना त्या म्हणाल्या की, एका पत्रकाराने केलेले ट्वीट रूचले नाही म्हणून त्याला जेलमध्ये टाकण्यात आले. कोणी वाराणसीच्या संदर्भात काही बातमी दिली असेल किंवा करोना रूग्णाच्या नातलगांना सफाईचे काम करावे लागत असल्याच्या बातम्या दिल्या असतील तर त्या पत्रकारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, आणीबाणीच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की ज्या प्रकारे लोकनियुक्त सरकारने पाडली जात आहेत, त्यावरून ही आणीबाणी आहे असे वाटत नाही का? कॉंग्रेसच्या काळात आणीबाणी लावण्यात आली ती चूक होती. पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या मंचावर त्याची कबुली दिली आहे आणि दिलगिरीही व्यक्त केली आहे. मात्र त्या घटनेचा आधार घेत आजच्या सरकारच्या प्रत्येक चुकीचे समर्थन करणे योग्य ठरत नाही.
दरम्यान, या चर्चेच समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनीही सरकारवर टीका केली. हे लोकतंत्र नसून भाजप डरपोक तंत्र असल्याचा आरोप करताना रोज संध्याकाळी हिंदू मुस्लिम विषयावर चर्चा सुरू केली जाते. करोनाच्या संकट काळात विशेष जमातीला लक्ष्य केले जाते याकडे लक्ष वेधले.