टोरांटो – भारतात गेल्या काही काळापासून कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. देशात या विषयावर राजकारण होते आहे आणि उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र देशाच्या बाहेर कॅनडा या देशानेच प्रथम शेतकऱ्यांची बाजू घेत भारतावर टीका केली होती. त्यांच्या पंतप्रधानांनीही त्यांच्या देशाच्या या भूमिकेचे समर्थन केले होते.
कृषी कायदे हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे भारताकडून सांगण्यात आल्यावरही कॅनडातील काही लोकांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तेथे निदर्शने केली होती. मात्र ज्या देशात भारतावर टीका झाली त्याच देशात आज भारताच्या पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लावण्यात आल्याची बातमी आहे. त्याचे कारण भारताने करोना लसीची केलेली मदत.
करोनाच्या विरोधात काही देशांनी लस तयार केली आहे. त्यात भारताचा समावेश आहे. भारतात दोन लसींचे उत्पादन सुरू असून लसीकरणाची मोहीमही वेगाने राबवली जाते आहे. केवळ आपली गरज नाही तर शेजारी आणि अन्य ज्या देशांनी लस मागवली त्या सगळ्या देशांना भारत मदत करतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही भारताच्या या भूमिकेचे कौतुक जाहीरपणे केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार भारताने आतापर्यंत 65 देशांना लसीचा पुरवठा केलेला आहे. त्यात कॅनडाचाही समावेश आहे. दि. 4 मार्च रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारताने पाच लाख लसी त्या देशाला पाठवल्या आहेत. भारताच्या या कृतीमुळे शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेले नकारात्मक वातावरण निवळल्याचे दिसते आहे. त्या देशात मोदींचे आभार मानणारे फलक झळकले असल्याचे वृत्त आहे. ग्रेटर टोरांटो या भागात असे 9 फलक लावण्यात आले असून त्यांची छायाचित्रेही इंटरनेटवर पाहायला मिळाली आहेत.