नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मेादी यांनी राजदचे नेते तेजस्वी यादव हे निवडणुकीनंतर तुरूंगात जातील अशी जाहीर धमकी दिली आहे. कोणाला तरूंगात टाकायचे हे त्यांच्या मनावर नसते, पण तरीही ते असे म्हणत असतील तर तपास यंत्रणा या आपल्याच इशाऱ्यावर चालत असल्याची मोदींनी दिलेली ही कबुलीच आहे असे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना सिब्बल म्हणाले की, असे कोणीही कोणालाही लगेच तुरूंगात टाकू शकत नाही, त्यासाठी एक प्रक्रिया असते, परंतु तरीही मोदी असा इशारा देत असतील तर ती तपास यंत्रणा आपल्याच इशाऱ्यावर चालत असल्याची ही जाहीर कबुली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
सिब्बल यांनी मोदींच्या ‘मुजरा’ टिप्पणीबद्दलही त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदींनी विरोधक मुजरा करतात असे केलेले वक्तव्य हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात असे म्हटले आहे की इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास पाण्याचे नळ, वीज, आणि बँक खात्यातील पैसे बँकांचे पैसे ते काढून घेतील.
विरोधक मुस्लिमांच्या मतांसाठी त्यांच्यापुढे मुजरा करीत आहेत असेही मोदींनी म्हटले आहे.मोदी एका उच्च पदावर बसले आहेत, या पदाला एक प्रतिष्ठा आहे.पण मोदी आपल्या वक्तव्याने या पदाची प्रतिष्ठाच कमी करीत आहेत. त्यांच्या विधानांवरून सोशल मिडीयात काय प्रतिक्रीया उमटत आहे ते पहा असेही सिब्बल यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी मुजरा शब्दाचा वापर करणे हा महिलांचाही अवमान आहे असे ते म्हणाले.सिब्बल म्हणाले, मला माहित आहे की निवडणूक आयोग या प्रकरणी काहीही करणार नाही, जरी मला वाटते की हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे तरीही आयोग काहीही करणार नाही कारण त्यांचे आणि सरकारचे साटेलोटे आहे.