भारती गोसावी यांच्यासारख्या कलावती या केवळ “आठवणीत’ नव्हे तर साठवणीत असायला हव्यात, असं ज्या वेळी मी ठासून सांगतो, त्यावेळी भारती गोसावी यांची कारकीर्द मला पुनःपुन्हा आठवाविशी वाटते. कारण “सं. पुण्यप्रभाव’ या नाटकात त्या किंकीणी हे पात्र रंगवताना दिसतात, तर “महाकवी कालिदास’, “सं. मंदोदरी’, “सं. तुका म्हणे मी वेगळा’, आणि “सं. मृच्छकटिक’, “सं. राजसंन्यास’, “सं. शाकुंतल’, “सं. प्रेमसन्यास’, “सं. शाकुंतल’, “सं. विद्याहरण’, “अशाही अनेक नाटकांतून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. हे सारं बघितल्यावर भारती गोसावी हे रंगभूमीवरचं एक आश्चर्यच वाटायला लागतं. कारण इतक्या नाटकांमधल्या विविध भूमिकांच्या नकला तर पाठ असायला हव्यात आणि त्या नकलांची एकमेकात गल्लत न करता भारतीताई हा सगळा पाठांतराचा द्राविडी प्राणायाम कसा काय करीत होत्या, असा प्रश्न पडतो. अर्थात, रंगभूमीवरचा असाच एक ताकदवान नट (अभिनेता) मला ठाऊक आहे. त्याचं नाव मा. दत्ताराम. त्यांचीही साधारण 200-250 नाटकं त्यातल्या विविध भूमिकांसह पाठ होती असं सांगतात. निर्मळ स्वभावाचा हा कलावंत वसईत राहायचा. तो आज हयात नाही. पण त्याची 200-250 नाटकं आणि त्यातल्या विविध भूमिका (केव्हाही, कुठल्याही नाटकात उभं राहायला सांगा हा “नटसम्राट’ कायम तयार) पाठ असल्याची कथा आजही नाट्यक्षेत्रात मोठ्या चवीनं सांगितली जाते. मा. दत्ताराम यांच्या नंतर मला तरी भारती गोसावी यांच्याच प्रचंड पाठांतराची सुरस कथा सांगावीशी वाटते. इतकं असूनही या अभिनेत्रीनं फारशी “डिंग’ मारल्याचं ऐकिवात नाही.
भारती केवळ संगीत नाटकातच रमलेली नायिका नाही, तर तिनं अनेक सामाजिक-समस्याप्रधान नाटकांतही भूमिका केलेल्या आहेत. आचार्य प्र. के. अत्रे यांच्या अत्यंत गाजलेल्या आणि ज्या नाटकाचे आजवर हजारो प्रयोग झाले आहेत त्या “लग्नाची बेडी’ या नाटकात भारतीनं एकच नव्हे, तर 3-4 भूमिका केलेल्या आहेत. ती या नाटकातली अरुणा साकारते. यामिनी करते. रश्मीची खट्याळ भूमिकाही करते आणि सध्या ती वयोपरत्वे गार्गीच्या भूमिकेत रंग भरताना दिसते. पु. ल. देशपांडे या मान्यवर नाटककाराच्या “तुझे आहे तुजपाशी’ या तुफान लोकप्रियता प्राप्त झालेल्या नाटकात ती कधी उषा तर कधी गीता तर कधी अतिविशाल महिलांच्या ग्रुपमध्ये रंगमंचावर वावरताना दिसते. पु. लं. च्याच “सुंदर मी होणार’ या नाटकात ती बेबी राजे आणि मेनका अशा दोन भूमिका करते. आचार्य अत्रे यांच्या “मोरूची मावशी’ या नाटकात ती निशा होते, तर मधुसुदन कालेलकरांच्या नाटकात ती भावना होताना दिसते. तोरडमलांच्या नाटकांत ती ठमी होते. “राजकारण गेलं चुुलीत’ या नाटकात बायजा होताना दिसते. याखेरीज “डार्लिंग डार्लिंग’, “कुर्यात् सदा टिंगलम्’, “चांदणे शिंपित जा’, “नटसम्राट’मध्ये ती कावेरी होते, अशा अनेक नाटकांतून ती विविध भूमिकांतून दिसते.
सध्या याही वयात ती “लग्नाची बेडी’, “तुझे आहे तुजपाशी’, “तुका म्हणे आता’, “नटसम्राट’ अशा काही निवडक नाटकांतून भूमिका करताना दिसते आहे. भारती गोसावी यांच्या सारख्या आणखी काही अभिनेत्रीही आपलं सर्वस्व पणाला लावून रंगभूमीवर वावरताना दिसतात. पण अशांची नावं नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कधी चर्चेतसुद्धा येत नाहीत किंबहुना त्या चर्चांच्या जवळपासही येत नाहीत. मला वाटतं अशा मोठ्या पदांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अगदी वेगळाच असावा आणि त्यामागचं राजकारणही निराळी वाट करून जात असावं. त्यामुळे अहोरात्र रंगभूमी एके रंगभूमी, रंगभूमी दुणे रंगभूमी, रंगभूमी त्रिक रंगभूमी असा रंगभूमीचा सातत्यानं ध्यास घेणाऱ्या मंडळींचा, मान्यवर पदांसाठी कधी विचारच होत नसावा. मग त्याचं कलाक्षेत्रातलं योगदान हे राजकीय क्षेत्रात आयुष्यभर सतरंज्या घालणाऱ्या कार्यकर्त्यांसारखं राहतं. हे दुर्दैवाचं आहे पण तेच खरं आहे. भारती गोसावी यांच्याबद्दल एक अतिशय समाधानाचा भाग म्हणजे त्यांची एकुलती एक कन्या सौ. सुचेता काणे या दृक्श्राव्य कार्यक्रम तयार करणाऱ्या कन्येनं भारती गोसावी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांच्यावर एक उत्तम असा कार्यक्रम तयार करून त्यांच्या समकालीनांना खास निमंत्रण देऊन तो त्या सर्वांना दाखवला. नाहीतर त्यांचा व्हिडिओ मुद्दाम कोण करणार! आपलाच ढोल वाजवित राहणारी ही कलावंत मंडळी नाहीत.
नाहीतर भारती गोसावी या अभिनेत्रीनं नाट्याचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी, गोविंद बल्लाळ, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, पु. भा. भावे, विद्याधर गोखले, वसंत कानेटकर, मधुसुदन कालेलकर, बाळ कोल्हटकर, चि. त्र्यं. खानोलकर, नागेश अशा एकेक मान्यवर नाटककारांच्या नाटकातली भाषा आपल्या जिव्हेवर खेळवली आहे आणि त्यातल्या अनेक भूमिका या तोंडपाठ करून ठेवलेल्या आहेत. अगदी आयत्या वेळी एखाद्या नाट्यप्रयोगाचा खोळंबा होऊ नये म्हणून. मला हे सर्वाधिक महत्त्वाचं वाटतं. पुन्हा त्याबाबतची “टिमकी मारणं’ नाही. भारती गोसावी या अभिनेत्रीनं कुणा कुणा कलाकाराबरोबर भूमिका केल्या आहेत त्या कलाकारांच्या नावांची नुसती यादी जरी डोळ्याखालून घातली, तर हिराबाई बडोदेकर, छोटा गंधर्व, मा. दत्ताराम, जयराम आणि जयमाला शिलेदार, रमेश देव, सीमा देव, सूर्यकांत, वसंत शिंदे, हंसा वाडकर, राम मराठे, शरद तळवलकर, राजा गोसावी, अरुण सरनाईक, श्रीकांत मोघे, निळू फुले, पद्मा चव्हाण, मधु कांबीकर, काशिनाथ घाणेकर इत्यादी. परंतु हे खेदानं म्हणावं लागतं की भारती गोसावी यांचं नाव वरीलपैकी कुणाही कलाकाराएवढं झालेलं नाही, हे दुर्दैव. (समाप्त)
डॉ. विश्वास मेहेंदळे