नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, या आंदोलनाला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला आहे. राहुल यांनी म्हटले आहे, की ज्या शेतकऱ्यांची मुलं देशाच्या सीमेवर आपला जीवही अर्पण करतात. त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारने दिल्लीच्या सीमांवर खिळे अंथरले आहेत. ते म्हणाले, शेतकरी आपला अधिकार मागत आहेत. मात्र, केंद्र सरकार त्यांना अधिकार देण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार करत आहे.
राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाविषयी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी,”देशाच्या सीमेवर ज्यांची मुलं आपला जीव अर्पण करतात, त्यांच्यासाठी दिल्लीच्या सीमेवर खिळे अंथरले आहेत. अन्नदाता अधिकार मागत आहे, सरकार अत्याचार करत आहे!”
देश की सीमा पर जान बिछाते हैं जिनके बेटे,
उनके लिए कीलें बिछाई हैं दिल्ली की सीमा पर।अन्नदाता माँगे अधिकार, सरकार करे अत्याचार!#FarmersProtests
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 6, 2021
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच, केंद्र सरकारला कुटल्याही परिस्थितीत लागू केलेले तीनही कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असे म्हटले होते. गुरुवारी राहुल यांनी ट्विट केले होते, की “जे लोक धान्य पेरून धैर्याने पिकाची वाट पाहतात, महिन्यांची प्रतीक्षा आणि खराब हवामानालाही ते घाबरत नहीत! तिन्ही कायदे मागे घ्यावेच लागतील!”
केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या 26 नोव्हेंबरपासून हे शेतकरी आंदोलक दिल्लीच्या सीमेवर वेग-वेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. केंद्राणे आणलेले तीनही कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, अशी या आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. याशिवाय किमान आधारभूत किंमतीसंदर्भातही कायदा करण्यात यावा, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे. आज हे शेतकरी आंदोलक काळा दिवस पाळत आहेत.