नवी दिल्ली -पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 8 टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
पेशाने वकील असणाऱ्या एम.एल.शर्मा यांनी संबंधित याचिका दाखल केली आहे. बंगालमध्ये अनेक टप्प्यांत निवडणूक घेण्यापासून निवडणूक आयोगाला रोखावे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने नुकताच बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
त्यानुसार, बंगालमध्ये सर्वांधिक टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया होईल. आसाममध्ये 3 टप्प्यांत, तर उर्वरित ठिकाणी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लांबलचक प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. अशात तो विषय आता सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. ती सुनावणी राजकीय उत्सुकता वाढवणारी ठरण्याची चिन्हे आहेत.