मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रीमंडळात बंजारा समाजाचं असलेलं प्रतिनिधीत्व कमी झालं आहे. हे भरून काढण्यासाठी मंत्रीपदासाठी आता विदर्भातील आणखी एका मंत्र्याचं नाव चर्चेत आलं आहे.
बंजारा समाजाचं नेतृत्व असलेले संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजात (भटके व विमुक्त समाज) निराशा पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बंजारा समाजाच्या मोठ्या नेतृत्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही काही जणांकडून केला जात आहे. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाज नाराज होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचं समजतं.
पुसदचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रिपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी इंद्रनील मुंबईत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तत्पूर्वी पूजा चव्हाण प्रकरणाच्या मदतीने समाज माध्यमातून, प्रसार माध्यमातून बंजारा समाजाची आणि माझी प्रतीमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पूजा चव्हाणच्या प्रकरणाचा तपास व्हावा आणि सत्य बाहेर यावी ही आपली इच्छा असल्याची संजय राठोड यांनी म्हटलं आहे.