नवी दिल्ली – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपच्या या भूमिकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कडाडून टीका केली आहे.
या प्रकरणात काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल ज्या दिवशी येईल त्यादिवशी काँग्रेस भूमिका स्पष्ट करणार आहे. मात्र सातत्याने पूजा चव्हाणचे आई-वडिल जे म्हणत आहेत, त्याकडे लक्ष द्यायला हवं. त्यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र भाजपने या प्रकरणात उताविळपणा केला आहे. आई-वडील म्हणतात बदनामी थांबवा, मग भाजप का उताविळपणा करत आहे, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.
यापूर्वी सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात भाजपने असंच केलं. त्यावेळी त्यांनी सीबीआय चौकशी का केली नाही, त्यात भाजपचे लोक सहभागी होते, म्हणून त्यांनी चौकशी केली नसल्याचा दावा पटोले यांनी केला. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याचा दिलेल्या इशाऱ्यावर पटोले यांनी टीकास्त्र सोडले. फडणवीस हे मोदींचे शिष्य आहे. ते काहीही करू शकतात असं ते म्हणाले. परंतु, पूजाच्या आई-वडिलांच म्हणण काय आहे, ते तर ऐकूण घ्यायला, असं आवाहनही पटोले यांनी केलं.