-ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहूकर
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितां सिद्धवत । कर्महीना निश्चित । होईजेना ।। कीं प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्य होईजे । हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ।। सांगैं पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे । तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ।।
माऊली म्हणतात, कर्माचा आरंभ केल्यावाचून उचित असे वर्णविहित कर्म न करताच, कर्महीन साधकाला सिद्ध पुरुषाप्रमाणे एकदमच निष्कर्म निश्चितच होता येणार नाही. अधिकारपरत्वे आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म टाकल्याने, नैष्कर्म अवस्था प्राप्त झाली आहे, असे म्हणणे मूर्खपणाचे व्यर्थ बोलणे आहे.
पुराच्या संकटामुळे नदीच्या पैलतीरी जाणे आवश्यक असताना नावेचा त्याग करणे शहाणपणाचे लक्षण आहे का? जोपर्यंत इच्छा-वासना नष्ट झाली नाही तोपर्यंत कर्मे करावीच लागतात. परंतु आत्मतृप्ती झाली की, कर्म आपोआप बंद पडते. त्यामुळे प्रारब्धाचा विचार न करता प्रयत्नाची कास धरून आपले विहित कर्म प्रामाणिकपणे करणे योग्य आहे.