यवत/ जळोची -पुणे ते बारामती दरम्यान ‘मेमू’ (मेनलाइन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली. सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार सुनील तटकरे आणि फौजिया खान यांनी गोयल यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेशी संबंधीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
पुणे ते बारामती दरम्यान ‘मेमू’ (मेनलाइन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी. ही गाडी सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय प्रदूषणही कमी होऊ शकेल. पुणे ते दौंड दरम्यानच्या मार्गावरील फलाटांची उंची वाढविण्यात आली असून या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘मेमू’ लवकर सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दौंड स्थानकावरुन बहुतांश सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसला दौंडपर्यंत प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणीही केली. पुणे-सिकंदराबाद, चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस, हमसफर, संपर्क क्रांती गाड्यांना दौंड येथे थांबा द्यावा, अशीही मागणी केली.
नीरा, पुरंदर येथील मुस्लीम बांधवांना प्रार्थना स्थळापर्यंत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावा लागतो. याठिकाणी रेल्वेरुळाचे काम होणार असून या कामासोबतच भुयारी मार्गाचे काम करावे, अशी सूचना केली. नीरा स्थानकावर हजरत निजामुद्दीन-गोवा गाडीला थांबा द्यावा, जेजुरी स्थानकाचे विस्तारीकरण सुरु असताना प्राथमिक शाळा व अंगणवाडीची इमारत पाडली होती. ही शाळा व अंगणवाडीसाठी रेल्वेने पर्यायी जागा उपलब्ध करावी, अशीही मागणी यावेळी मांडली.
जेजुरी-नीरा मार्गावरील सुकलवाडी, रेल्वे गेट क्रमांक 25 येथे भुयारी मार्ग बांधावा, सुकलवाडी येथे रेल्वे पुलाखाली पाणी साठू नये याची दक्षता घ्यावी ही सूचनाही केली. जेजुरी स्थानकावरील पादचारी उड्डाणपुलाचे विस्तारीकरण, रेल्वे स्थानकात महिलांसाठी वेटींग रुम सुरू करून तेथे महिला आरपीएफ अधिकारी तैनात करावेत, ढालेवाडी रेल्वे गेट ते जेजुरी स्थानकदरम्यान सर्व्हिस रोड तयार करणे, कोळविहिरे येथे उड्डाणपूल बांधावा, आदी मागण्या मांडण्यात आल्या. चेन्नई एक्सप्रेसचा भिगवण रेल्वे स्थानक हा थांबा रद्द करण्यात येऊ नये, भिगवण परिसरातील नागरिकांना हे स्टेशन सोयीचे असून येथे हैद्राबाद -मुंबई एक्स्प्रेस गाडीला थांबा द्यावा, आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सहजपूर आणि कासुर्डी येथे रेल्वेला थांबा द्या
दररोज दौंडहून पुणे आणि पुण्याहून पुन्हा दौंड असा रेल्वे प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. यात कामगार, पोलीस, शेतकरी, छोटे व्यावसायिक, विद्यार्थी इतकेच नाही तर अन्य अनेक कारणांनी प्रवास करणारे, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांचा समावेश आहे. सहजपुरपासून उरुळी कांचन रेल्वे स्टेशन साधारण आठ ते दहा किलोमीटर इतक्या अंतरावर असून ते अंतर प्रवाशांसाठी सोयीचे असल्याने सहजपूर आणि कासुर्डी येथे रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा, अशी प्रवाशांची मागणी असल्याचे सुळे यांनी गोयल यांच्या लक्षात आणून दिले.