प्रेम म्हणजे काय? असं जेव्हा कोणी विचारतं, तेव्हा मनात येतंच… कसं आणि काय द्यावं याचं उत्तर? माझ्यासाठी प्रेम म्हणजे असा प्रत्येक क्षण जो एकमेकांनी एकमेकांसोबत जगलेला असेल. ती पहिल्यांदाच भेटतेय,अजून तिचा अंदाज आला नाहीये. त्यातच तिला उशीर होतोय यायला. मनाची धडधड वाढलीय. तिला डोळे भरून पाहायचेय आणि मुद्दाम उशिरा आलेली ती, मान वर करायलाही तयार नाही. एका कपात कॉफी शेअर कराविशी वाटते, असा विचार नकळत मनात येतो अन् मोहरायला होतं. त्याचवेळी तिने पाण्याची बॉटल ओठांवर टेकवलेली असते आणि आपला जीव; आपण बॉटल असतो तर… या विचाराने निम्मा निम्मा होतो. सगळ्यात हाइट ही की आपली ही अशी उडालेली तारांबळ तिला “व्यवस्थित’ कळलेली असते. अन् जेव्हा ती हलके हसते… तो क्षण म्हणजे प्रेम..!
कुछ नजर नहीं आता तसव्वुर के सिवा
हसरत-ए-दिदार ने आंखोंको अंधा कर दिया…
प्रेमाचे क्षण हे काजव्यांसारखे असतात. काही काळासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्याचं देखणेपणही काही काळापुरतंच अनुभवायला मिळतं पण ते अविस्मरणीय असतं. आपल्याला हव्याहव्याशा वाटणाऱ्या व्यक्तीपासून जीवलग होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम.
आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवापासून त्या अनुभवलेल्या प्रत्येक क्षणापर्यंतचे जगणे म्हणजे प्रेम. त्यातही जर हे अनुभव पहिलेवहिले असतील तर मनात खोलवर रुजून राहतात. त्याची बाइक बंद पडलेली असताना त्याला सोबत म्हणून त्याच्यासोबत त्याचं हेल्मेट हातात धरून चालणं असो, की नाटक संपायला उशीर झाल्यावर त्यानं तिला सुखरूप घरी पोचवणं असो. पहिली कॉफी, पहिला एकत्र पाहिलेला सिनेमा,नकळत गुंफली गेलेली बोटं आणि मौनाची भाषा… त्याच्यासोबतचा प्रत्येक पहिला क्षण… सारंच पहिल्यांदा घडलेलं आणि आजही ते सारंकाही जसंच्यातसं जपून ठेवलेलं. त्याच्या किंवा तिच्यासकट… हे प्रेम..!
सच को मैने सच कहा,
जब कह दिया तो कह दिया
अब ज़माने की नज़र
में ये हिमाकत है तो है..
वो नही मेरा मगर उससे महोब्बत है तो है
ये अगर रस्मों रिवाज़ों से बग़ावत है तो है..
दिप्ती मिश्राची ही गझल प्रेमाचे सारेकाही सांगून जाते. प्रेमाची परीभाषा,परिघ सारंकाही. इतर कोणता विचारच प्रेम करताना मनात येत नाही. त्याचं किंवा तिचं प्रेम असो वा नसो, तो किंवा ती मिळो ना मिळो फक्त तो किंवा ती “परकी’ न होवो हीच अपेक्षा. बरं अपेक्षा तरी कसे म्हणावे हसरत-ए-इश्क म्हणू हवंतर… हेही प्रेमच. एकमेकांचे आहोत हे माहीत असतानाही त्याचं किंवा तिचं सतावणं… हे ही प्रेमच की!
आपल्याला खरंतर कधीच माहिती नसतं की पुढच्या क्षणी कोणतं सरप्राइज आपली वाट पाहातयं. म्हणून वेळ आहे तोवर आपल्या जीवलगाला मनातल्या भावना सांगून मोकळं व्हावं. जेव्हा माणसं वाचायची वेळ येते तेव्हा याच भावना डिक्शनरी सारख्या उपयोगी पडतात आणि आपण शिकत राहतो “प्रेमाचा’ अनुभव. मान्य की असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच असे नाही किंवा कधीकधी कधी येऊन गेले तेही कळत नाही. अथवा अशा संधी आपल्याकडून हुकतात म्हणूनच आपल्या या भावना ज्या त्या वेळी व्यक्त करणं आणि करता येणं हेही प्रेमच.
खूपशा गोष्टी असतात अशा पहिल्या वहिल्या प्रेमातल्या साक्षीदार. ज्या समजून घेतो आपण. एकमेकांची वाट बघणं असो, नजरेत नजर मिसळणं, डोळ्यांची भाषा बोलणं. खूपशा गोष्टी अशाही असतात पहिल्यांदा आपल्या जीवलगासोबत अनुभवलेल्या. एकमेकांचा हात हातात घेणं, किंवा सेकंडक्लासच्या गर्दीने बावरलेल्या तिला कवेत घेताना सुरक्षित करणं असो, मावळत्या सूर्यासोबत कातर होणं असो. पहिलं प्रेम, पहिला स्पर्श, पहिली वेदना, पहिला विरह, पहिली भेट, पहिली पहाट… हे सारं पहिलंवहिलं जपणं हेही प्रेमच.
प्रेम असंही प्रेम तसंही. बोललेलं अन् अव्यक्तही. म्हणून काळ कोणताही असो, पिढी कोणतीही असो. प्रेमाची जागा तीच आणि तिथेच आहे, जिथे सुरुवातीला होती. प्रेम ही अतृप्त भावना आहे. मुळात ती दोन्ही बाजूला सारखी असल्याशिवाय उमलत नाही. फुलत नाही. प्रेम हे अभंग, दोहे, विराणी यांच्याही पलिकडचे, शब्दांमध्येही न मावणारे आहे. म्हणूनच प्रेम हे प्रेमच असते आणि एकदा तरी अनुभवायचे असते.
दूर थे और दूर हैं हरदम ज़मिनों-आसमॉं
दूरीयों के बाद भी दोनों में कुर्बत है तो है…
मानसी चिटणीस