-अमित डोंगरे
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने शुक्रवारपासून इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याकसोटी सामन्यात काही अनाकलनिय निर्णय घेतले. डावखूरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी देण्याऐवजी शाहबाज नदिमला संघात स्थान दिले. नदिमने अशी कोणती कामगिरी केली होती की त्याचा दुखापतग्रस्त अक्सर पटेल व कुलदीप यादवच्या जागी संघात समावेश झाला. याचे उत्तर एकतर कोहली किंवा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीच दोऊ शकतील किंवा निवड समिती. मात्र, हा निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक तर होताचपण अनाकलनियही होता.
बिहारकडून देशांतर्गत तसेच आयपीएल स्पर्धेत खेळलेल्या नदिमची अशी कोणती कामगिरी निवड समिती किंवा कर्णधार व संघ व्यवस्थापनाच्या नजरेत भरली की त्याला थेट कसोटी संघात स्थान मिळावे. खरेतर याचा आनंद वाटण्याऐवजी आश्चर्य वाटत आहे. त्याने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पदार्पणकेले होते. मात्र,त्यानंतर त्याला पुन्हा संघात स्थान दिले गेले नव्हते मग अचानक तो कसा काय उगवला.
नदिमने 2015-16 सालच्या रणजी मोसमात सर्वाधिक गडी बाद केले होते. तसेच त्याने त्यानंतरच्या मोसमातही याच कामगिरीची पूनरावृत्ती केली आहे. मात्र, केवळ याच जोरावर त्याला कसोटीसंघात पुन्हा संधी मिळाली असेल तर त्यावर आश्चर्यच व्यक्त होणार. कोणाच्याही चर्चेत नसलेला मात्र, आयत्या वेळी संघात निवडल्या गेलेला नदिम एक ऑफस्पीन गोलंदाज आहे. तसेच उपयुक्त फलंदाज आहे हे मान्य मात्र, त्याला संधी देताना कुलदीपला का वगळले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बरे दुसरा विचार केला तर असेही दिसूनयेते की सेकंड बेंचला भवितव्य म्हणून सातत्याने खेळवले गेले पाहिजे पण नदिम सेकंड बेंचमध्येही नव्हता. या निर्णयामागे बीसीसीआयचा तसेच निवड समितीचा दबाव असणार हे लहान पोरही सांगेल. आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले होते. गेल्या मोसमात तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. पणमग आयपीएलमधील कामगिरी थेट कसोटीसाठी कधीपासून ग्राह्य धरली जाऊ लागली याचे उत्तर निवड समिती देईल का. असो,
या कसोटीत कर्णधार कोहलीने इशांत शर्माची निवड केवळ अनुभवाच्याजोरावर केली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मग ऑस्ट्रेलियात अफलातून कामगिरी केलेल्या महंमद सिराजला का वगळले गेले याचे संयुक्तीक कारण कोहली किंवा निवड समिती देणार का. खरेतर ज्या इंग्रंजांच्या संघाविरुद्ध हा कसोटी सामना सुरू झाला त्यांच्याच देशातील अत्यंत बोगस रोटेशन पॉलिसी किंवा कोटा पद्धती बीसीसीआय आणखी किती काळ वापरत राहणार. याच पद्धतीमुळे देशातील प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व द्यावे लागतअसेल तर गुणवत्ता मागे राहून वशिल्याचे तट्टूच खेळताना यापुढेही दिसत राहतील.
याच पद्धतीमुळे इशांतसह नदिमला संघात निवडले गेले आहे हे सूर्यप्रकाशाइतके साफ आहे. त्यात परत कोणताही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला तर तो जेव्हा पूर्ण तंदुरुस्त ठरतो तेव्हा त्याला थेट संघात निवडले जाते ही कृतीही बीसीसीआयला येत्या काळात बदलावी लागेल अन्यथा तेच चेहरे संघातील जागा उबवत राहतील व नवी गुणवत्ता केवळ पर्याय म्हणूनच वापरली जाईल. भवीष्याचा विचार करता हे भारतीय संघासाठी खूप मोठे नुकसानकारक ठरेल.