कोल्हापूर ( प्रतिनिधी) – यंदाच्या अर्थसंकल्पात ( Budget 2021 ) केंद्रसरकारने महाराष्ट्राच्या वाट्याला अक्षता पुसण्याचे काम केले आहे. केंद्र सरकार महाराष्ट्र राज्याचे जीएसटीचे 38 हजार कोटी देणे आहे. मात्र एखाद्या विरोधी राज्याला आर्थिक त्रास असा द्यावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा अर्थसंकल्प आहे. असा घणाघात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते.
पुढे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र राज्यावर फार मोठा अन्याय झाला आहे. केवळ मेट्रोसाठी आर्थिक तरतूद केली आहे. तर दुसरीकडं भरघोस अशी तरतूद येणाऱ्या राज्यातील निवडणुकीसाठी केली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांसाठी भरपूर तरतूद केली आहे. असेही मुश्रीफ म्हणाले.
धोरणामुळे आर्थिक स्त्रोत आटल्यानंतर वास्तविक ज्या राज्यांचे देणे आहे. त्यावर अर्थसंकल्पात तरतूद करणे आवश्यक होतं. मात्र तसे न करता संपूर्ण देशाला दिलासा न देता केवळ निवडणुकीचा राजकीय हेतू समोर ठेवून हा अर्थसंकल्प जाहीर केला. विशेषता महाराष्ट्र राज्यावर फार मोठा अन्याय केला आहे. असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.
पुढे मुश्रीफ म्हणाले, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना निराश करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. गेल्या 65 दिवसांपासून दोन लाख शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत व्यवहार चुकीचा होत आहे. मात्र यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांवर देखील अन्याय करणार आहे. असे देखील मुश्रीफ म्हणाले.