ओतूर – नगर-कल्याण महामार्गावर रविवारी (दि. 31) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात खासगी ट्रॅव्हल बस उलटून झालेल्या अपघातात 18 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत.
उल्हासनगर येथील शाह कुटुंबीय अष्टविनायकाचे दर्शन करून परतताना माळशेज घाटातील ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील आंबा वळणावर भाविकांची खासगी बस (एमएच 46 एएच 0109) कल्याणच्या दिशेने जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील टोकावडे पोलीस व महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघाताची घटना समल्यानंतर परिसरातील रुग्णवाहिकांमधून जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी आळेफाटा तसेच मुरबाड येथे पाठविण्यात आले आहे.
माळशेज घाटातील धोकादायक नागमोडी वळण असून या मार्गात सतत दरडी कोसळतात. यामुळे या घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. या घाटातील धोकादायक प्रवास आजपर्यंत अनेकांच्या जिवावर बेतला आहे. त्यामुळे माळशेज घाटातील अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे.