पुणे -व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी ईब्ल्यूएस, नॉन क्रिमिलेअरसह अन्य प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी पावती सादर केली होती. त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, हा प्रवेश तात्पुरता ग्राह्य धरला जाणार असून, मूळ प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनाकांच्या आता सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार असल्याचे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले.
तंत्रशिक्षण विभागांतर्गत पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीनंतर प्रवेश निश्चित करताना विद्यार्थ्यांना मूळ प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सुरू आहे. त्यासाठी विविध प्रवर्गातून प्रवेश घेत असताना सर्व विद्यार्थ्यांकडे मूळ कागदपत्रे उपलब्ध नाहीत. तसेच, करोनाच्या पार्श्वभूमीवरही विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे वेळेत मिळण्यास अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासनाने प्रमाणपत्र सादर केल्याची पावतीवरून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ज्या विद्यार्थ्यांकडे मूळ प्रमाणपत्रे प्राप्त झालेली आहेत, त्यांनी त्यांच्या लॉगीनमधून कागदपत्रे अपलोड करावीत. ज्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र उपलब्ध झालेली नाहीत, त्यांनी तात्पुरता प्रवेश घ्यावा. त्याची नोंद संस्थेने त्यांच्या लॉगीनमधून अपलोड करावी. मात्र, मूळ कागदपत्रे दुसऱ्या फेरीच्या अंतिम दिनांकाच्या आत अपलोड करणे आवश्यक आहे, असेही राज्य सीईटी सेलने सांगितले.