नवी दिल्ली- भारताची अर्थव्यवस्था आगामी काळात वाढणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक केल्यास त्यांना योग्य परतावा मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
जागतिक आर्थिक मंच परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मोदी म्हणाले की, करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भारतातील 80 कोटी लोकांना त्याचा संसर्ग होईल. किमान 20 लाख मृत्यू पावतील असे बोलले जात होते. मात्र, भारताने करोनाचा योग्यप्रकारे मुकाबला केला. त्यामुळे भारताची मनुष्यहानी टळली आहे. इतर देशांपेक्षा भारतातील आरोग्यविषयक सुविधा कमी असूनही भारताने या काळात उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताने अल्पावधीत जगाला दोन लसी उपलब्ध केल्या. त्यामुळे त्याचा भारताबरोबरच इतर देशांना होत आहे. लवकरच भारतात तयार झालेल्या आणखी काही लसी उपलब्ध करण्यात येतील. आता भारतामध्ये जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये 23 लाख लोकांना लस दिली आहे. पुढील काही महिन्यांत 30 कोटी ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्याचबरोबर 150 देशांना लस पुरवण्याचा कार्यक्रम तयार केला आहे.
करोना हाताळण्यासाठी विविध उपकरणाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला आहे. भारताने विविध उद्योगांना मदत केली. त्यामुळे आगामी काळात हे उद्योग अधिक उत्पादक होणार आहेत. या काळात जागतिक गुंतवणूकदारांनी भारतावर विश्वास दाखवून भारतात गुंतवणूक वाढविली आहे. आता भारताची परिस्थिती आणखी सुधारणार आहे.