नवी दिल्ली –केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणी व्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रस्तावावर विचार करण्याची सरकारची तयारी आहे, असे सूतोवाच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी गुरूवारी केले. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रमुख मागणीच मोदी सरकारला अमान्य असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये उद्या (शुक्रवार) चर्चेची आठवी फेरी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, तोडगा निघणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर आताच काही सांगू शकत नाही. चर्चेत कुठले मुद्दे पुढे येतात त्यावर सर्व काही अवलंबून आहे, असे उत्तर तोमर यांनी दिले.
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी सरकारला मान्य नसल्याचेही त्यांच्या वक्तव्यातून सूचित झाले. त्यामुळे चर्चेच्या नव्या फेरीतून तरी कोंडी फुटणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीवर शेतकरी आंदोलक ठाम आहेत. त्यामुळे चर्चेच्या आधीच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत.