पुणे – काही राज्यांमध्ये विविध प्रकारचे पक्षी मृत्युमुखी पडत असून, यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. प्रथमदर्शनी याचे कारण बर्ड फ्ल्यू संसर्ग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे देशभरातील सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, प्राणिगंग्रहालये, अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प प्रमुखांनी आपल्याकडील वन्यजीवांची काळजी घ्यावी, अशी सूचना केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने दिली आहे.
हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्ये हजारोंच्या संख्येने कावळा, बदक आणि इतर पक्षी विशेषत: स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.
यापाठीमागे प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू या रोगाचा संसर्ग असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: सध्याच्या हंगामात स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होत असते.
अशावेळी देशात कोठेही पक्ष्यांच्या मृत्यूच्या घटना घडत असल्यास, ताबडतोब त्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.