नवी दिल्ली – कर आकारणीच्या संबंधात सध्या पाच लाख दावे कोर्टात प्रलंबीत आहेत. या वादावर तडतोडीने तोडगा काढण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहीमे अंतर्गत एक लाख दावे निकाली काढले जात आहेत अशी माहिती अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली. या एक लाख प्रकरणांमध्ये 83 हजार कोटींची कर रक्कम अडकली आहे. त्यावर तोडगा काढून ही प्रकरणे तडजोडीने मिटवली जातील असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विवाद से विश्वास या योजनेअंतर्गत कर विषयक वादाच्या प्रकरणांवर तोडगा काढला जाणार आहे. प्रत्यक्ष कर प्रणालीतील 9 लाख 32 हजार कोटी रूपयांच्या कर आकारणीच्या संबंधात करदात्यांनी कोर्टात दावे सादर करून या करवसुलीला आव्हान दिले आहे.
या संबंधात एकूण 4 लाख 80 हजार प्रकरणे कोर्टात प्रलंबीत आहेत. त्यामुळे मोठी रक्कम या दाव्यांमध्ये अडकून पडली आहे. पण केंद्र सरकारच्या विवाद से विश्वास या मोहीमे अंतगत 96 हजार करदात्यांनी आपल्या वादाच्या संबंधात तडजोड स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. त्यातून 83 हजार कोटी रूपयांच्या करांची प्रकरणे निकाली निघण्याची शक्यता आहे. विवाद से विश्वास या मोहीमेची मुदतही सरकारने 31 जानेवारी पर्यंत वाढवली आहे.