शिरवळ (प्रतिनिधी) – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस राज्यात महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा दिवस संपूर्ण देशात साजरा व्हावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आद्य स्त्री समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या जनक, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 190 वी जयंती व भारतीय स्त्रीमुक्तीदिन समारंभ नायगाव, ता. खंडाळा येथे रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते.
सहकार व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मानसिंगराव जगदाळे, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, प्रांताधिकारी संगीता चौगुले, तहसीलदार दशरथ काळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, दत्तात्रय ढमाळ व मान्यवर उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या विद्यार्थिनी, शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या. देशात 3 जानेवारीला “सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन’ साजरा झाला पाहिजे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्वरित मान्यता दिली. दलित, शूद्र, मागासवर्गीय व महिलांना शिक्षण देण्याचे काम फुले दाम्पत्याने केले. 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात प्रथम मुलींची शाळा सुरू केली.
त्यावेळी दगड, धोंडे, शेण यांचा वर्षाव सहन करत, कशालाही न डगमगता सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षण देण्याचे काम केले. फातिमा शेख यांनीही त्यांच्या कार्यात भाग घेतला होता. अंधश्रद्धेच्या विरोधात फुले दाम्पत्याने केलेले कार्य अविस्मरणीय आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांही केला होता, मग आपण का करू नये? अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांचे मायबाप होण्याचे पुण्यकर्म त्यांनी केले. महाराष्ट्र शासनाने फुले दाम्पत्याच्या कार्याला न्याय दिला आहे. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे विचार सर्वांनी आत्मसात करावेत.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी अनंत यातना सहन करत, घेतलेला वसा पूर्ण केला. सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळेच महिलांची प्रगती झाली आहे, म्हणून 3 जानेवारी रोजी महिला शिक्षण दिन साजरा केला जात आहे.
भविष्यात कुठलीही मुलगी शाळेच्या बाहेर राहणार नाही आणि ती खूप शिकेल, मोठी होईल. महिलांनी अंतराळापासून राजकीय क्षेत्रापर्यंत उंची गाठली आहे. शंभूराज देसाई म्हणाले, नायगाव हे भारतवासीयांसाठी प्रेरणास्थान असून येथे येऊन सर्वांनी नतमस्तक व्हावे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी लवकरच दिशा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी आभार मानले.