मुंबई – मुंबईतील मेट्रो कारशेड प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मेट्रोची कारशेड कोठे बांधायची यावरून सध्या ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार वादंग सुरू आहे.
ठाकरे सरकारने आरे येथील कार शेड प्रकल्प रद्द करून तो कांजुरमार्गला हलवला होता. पण ती जागा आमची आहे असे केंद्र सरकारने राज्य सरकारला कळवले आहे आणि मुंबई हायकोर्टानेही या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. या जागेविषयी पवारांनी केंद्राशीही संपर्क साधायचे ठरवले आहे.
या संबंधात पवारांनी ठाकरे आणि फडणवीस यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. मेट्रोची तिसऱ्या लाईनची कारशेड आरे येथील जंगलात उभारण्याची योजना फडणवीस सरकारने आखली होती. पण त्यातून वनसंपत्तीचा मोठ्याप्रमाणात नाश होण्याची शक्यता असल्याने ठाकरे सरकारने तो प्रकल्प रद्द करून कांजुरमार्गला हलवला होता.
पण कांजुरमार्गाच्या जागेत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून केंद्र सरकारने खोडा घातला आहे. त्यामुळे सध्या हा विषय चांगलाच तापला आहे. त्यात समेट घडवण्याचा प्रयत्न पवारांकडून सुरू आहे असे सांगण्यात येत आहे.