कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विजयाचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आज तृणमुल कॉंग्रेसचे रणनितीकार प्रशांत किशोर यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की भाजपला दोन आकडी संख्याबळ पार करण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.
या पक्षाला दोन आकडी संख्याबळ ओलांडता आले तर आपण ट्विटरवर पुन्हा प्रकटणार नाही असा दावाही त्यांनी केला असून त्यांनी आपला हा ट्विटर संदेश जपून ठेवा असे आवाहनही केले आहे.
प्रशांत किशोर यांनी इतक्या आत्मविश्वासाने भाजपला हे प्रत्युत्तर दिल्याने त्या संबंधात मोठे कुतुहल निर्माण झाले आहे.
प्रशांत किशोर हे तृणमुल कॉंग्रेसचे या निवडणुकीतील रणनितीकार आहेत. त्यांनीच सन 2014 च्या निवडणुकीत मोदींना बहुमत मिळवून देण्यासाठीची रणनिती आखली होती तेव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. बिहारमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नितीशकुमार यांच्यासाठी काम केले होते. व त्यातही त्यांना मोठे यश मिळाले होते. आता ते बंगाल मध्ये ममतांसाठी काम करीत आहेत.
प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, भाजपने आपल्या मर्जीतील साऱ्या प्रसार माध्यमांना हाताशी धरून बंगालमध्ये मोठी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी वस्तुस्थिती अशी आहे की भाजपला दोन आकडी जागा मिळवण्यासाठीही बंगालमध्ये मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यांनी येथे दोन आकडी संख्याबळ ओलांडले तर आपण ट्विटरवर पुन्हा प्रकटणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रशांत किशोर यांचे हे वक्तव्य अहंकारी असून राजकारणात अहंकार टिकत नाही अशी प्रतिक्रीया भाजपच्यावतीने विजयवर्गीय यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की प्रशांत किशोर हे पैसे घेऊन राजकीय पक्षांसाठी काम करतात तर भाजप हा समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या विधानांना महत्व देण्याची गरज नाही.