भूमी अभिलेख विभागाने फेरसर्वेक्षण करण्याची मागणी
खळद (वार्ताहर) – आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर सासवड ते जेजुरी दरम्यानच्या गावात निवाडा प्रक्रियेदरम्यान भूमिअभिलेख विभागाने केलेल्या चुकीमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांपासून वंचित राहावे लागले आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने स्थावर मालमत्ता व क्षेत्रांचे फेर सर्वेक्षण करावे, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.
याबाबत खळद व शिवरी येथील शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन क्रमांक 22 येथे आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. शिवरी, खळद, साकुर्डे, बेलसर व अन्य गावांचा निवाडा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अनेकांच्या शेतामध्ये असणाऱ्या स्थावर मालमत्तेचा, बिगर शेतीचा तसेच काही गटांचा यामध्ये उल्लेख झालेला नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीतून रस्ता जात असतानाही त्यांना मोबदल्यापासून वंचित राहावे लागत आहे तर काही शेतकऱ्यांच्या क्षेत्रांमध्ये असणाऱ्या बांधकामांचा, झाडांचा या प्रक्रियेमध्ये कोठेही उल्लेख झालेला नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रक्रियेबाबत आपल्या हरकती नोंदवल्या आहेत.
भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत. मात्र संबंधित विभागाने आम्हाला जी माहिती पुरविली त्यानुसार आम्ही हा निवाडा करत आहे. त्यामुळे सर्वांचे अर्ज चौकशीसाठी पुन्हा संबंधित विभागाकडे पाठविले जातील व त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावरती पुढील कारवाई करून शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो मोबदला दिला जाईल.
– एन. एस. झुंजार, नायब तहसीलदार.
अर्ज दिल्यानंतर चौकशी होऊन शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल, परंतू सर्वच शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळेल असे नाही, यातून अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्राबाबत झालेल्या चुकाही लक्षात येणार नाहीत, त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने पुन्हा याबाबत स्थावर मालमत्तेचे व क्षेत्रांचे फेर सर्वेक्षण करावे व सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
– बाळासाहेब कामथे, बाधित शेतकरी तथा माजी सरपंच खळद
खळद व शिवरी ही गावे पालखी महामार्गालगत आहेत. याठिकाणी मोठी औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे येथे जमिनीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. शेतकऱ्यांना भूसंपादन प्रक्रियेत दिलेली रक्कम ही समाधानकारक नाही. त्यामुळे आमच्या जमिनीचे, स्थावर मालमत्तेचे योग्य मूल्यांकन करून आम्हाला वाढीव रक्कम मिळावी.
– चंद्रकांत कामथे, बाधित शेतकरी