नवी दिल्ली – भारताचा हिटमॅन रोहित शर्माने बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तंदुरूस्ती चाचणी पास केली असली तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील किती सामन्यात खेळता येईल ते ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आणखी एका चाचणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
रोहित अखेरच्या दोन कसोटी सामन्यात खेळू शकेल मात्र, कसोटी सामने खेळण्याआधी रोहितच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवले जाणार आहे व त्याची पुन्हा एकदा चाचणी घेतली जाणार आहे. रोहित शनिवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली.
त्याच बरोबर रोहितच्या तंदुरुस्तीबाबत हे स्पष्टीकरण दिले आहे. रोहितने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्ती चाचणी पास केली होती. तेथिल वैद्यकीय पथकाने रोहितच्या चाचणीनंतर तो पूर्ण तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट केले.
मात्र, रोहित ऑस्ट्रेलियाला दाखल झाला असला तरीही त्याला विलगीकरणाचा कालावधी व त्यानंतरची चाचणी करावी लागणार असल्याने त्याला किमान दोन कसोटी सामन्यात तरी खेळता येणार का याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम राहिले आहे. रोहित 19 नोव्हेंबरपासून अकादमीत तंदुरुस्तीसाठी मेहनत घेत होता.