वानवडी (पुणे) – सतत वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या एका वाहन चालकाकडून पोलिसांनी तब्बल 27,200 रुपयांचा दंड एकरकमी वसूल केला आहे. ही कारवाई वानवडीतील भैरोबानाला चौकात वाहतूक पोलिसांनी केली. हे वाहन मुंबईतील उच्चभ्रू कुटुंबातील महिलेच्या नावावर आहे.
मुंबई ते पुणे ये-जा करत असलेल्या या वाहनावर अनियंत्रित वेग मर्यादा व नो पार्किंगचे नियम तोडल्याने मागील दोन वर्षांपासून ऑनलाइन दंड आकारण्यात आले होते. हा दंड वाहनचालकाने वेळोवेळी भरला नसल्याने ही रक्कम वाढत गेल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील भोसले यांनी सांगितले.
भैरोबानाला चौक येथे सुरू असलेल्या कारवाईत हे वाहन अडवण्यात आले होते. त्यादरम्यान गाडीचा नंबर पोलिसांनी मोबाइल ऍपवर तपासणी केली असता, वाहनावरील दंडाची रक्कम खूप मोठी असल्याचे समजले. त्यानुसार सुनील भोसले यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राजेश्वरसिंह राजपूत, हवालदार ज्योतीबा कुरुळे, शिपाई ज्ञानेश्वर गायकवाड व बाबासाहेब जगताप यांच्या पथकाने हा दंड वसूल केला.