सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यात आक्रमक शतकी खेळी केलेल्या ऋषभ पंतमुळे आता निवड समितीसमोर संभ्रम निर्माण झाला आहे. यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंची निवड करताना पहिल्यापासूनच वृद्धिमान साहा याच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता पंतने शतकी खेळी केल्यामुळे या दोघांपैकी कोणाची निवड करायची आसा प्रस्न समितीसमोर निर्माण झाला आहे.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला येत्या गुरुवारपासून ऍडलेड येथे सुरुवात होत आहे. हा सामना दिवस-रात्र पद्धतीने गुलाबी चेंडूवर खेळवला जाणार आहे. केवळ निवड समितीच नव्हे तर कर्णधार विराट कोहली व संघ व्यवस्थापनासमोरही आता नवा संभ्रम निर्माण झाला आहे.
कसोटी सामना खेळताना यष्टीरक्षकाच्या फलंदाजीच्या उपयुक्ततेपेक्षाही जास्त त्याचे यष्टीरक्षणातील कौशल्य पाहिले गेले पाहिजे. त्याची फलंदाजी ही अतिरीक्त लाभदायक बाब समजली जायला हवी. पंत व साहा यांची तुलना केली तर साहा जास्त योग्य वाटतो, असे मत माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांच्यासारखे फलंदाज आहेत. आशा फलंदाजांचा झेल जर यष्टीरक्षकाच्या हातातून निसटला तर ते मोठी खेळी करून आपल्या हातातून सामनाही हिरावून घेऊ शकतात. त्यामुळे यष्टीमागे सर्वोत्तम खेळाडूच असला पाहिजे. सध्याच्या संघाकडे पाहिले तर पंतपेक्षा साहा जास्त सरस वाटतो, असेही ते म्हणाले.
कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी दोन्ही यष्टीरक्षकांनी संघातील स्थानावर दावेदारी केली आहे. पहिल्या सराव सामन्यात साहाने अर्धशतक झळकावले होते. तर, दुसऱ्या सराव सामन्यात पंतने वादळी शतकी खेळी केली होती. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. साहा व पंत यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून संघात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा सुरु आहे.
यंदाच्या वर्षात पंतने न्यूझीलंड दौऱ्यात पंतने सुमार कामगिरी केली होती. त्याला चार डावांत 60 धावा करता आल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने 7 डावांत 58 च्या सरासरीने 350 धावा फटकावल्या होत्या. साहा याने मात्र, सातत्याने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. त्याची कामगिरी पंतपेक्षाही सरस असल्याने त्यालाच संधी मिळेल असे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे.