नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या चीनबरोबरच्या तणावाच्या काळात भारताची कसोटी पाहिली गेली, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले अहे. राष्ट्रीय सुरक्षेपुढील आव्हानाला भारताकडून यशस्वीपणे तोंड दिले जाईल, असा आत्मविश्वासही जयशंकर यांनी व्यक्त केला.
पूर्व लडाखमध्ये घडलेल्या घटना खूप त्रासदायक होत्या. तेथे घडलेल्या घटना गेल्या दशकभरात काळजीपूर्वकपणे वाढवल्या होत्या. त्यामुळे चीनबाबतच्या सद्भावना घटल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबतच्या कराराला न जुमानण्याची मानसिकता यातून दिसली.
त्यामुळे मूलभूत चिंता यामुळे वाढल्या आहेत, असे जयशंकर यांनी सांगितले. चीनबरोबरचा तणाव संपवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेसाठी निश्चित कालमर्यादेची शक्यता त्यांनी फेटाळली.
पूर्व लडाख भागात भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तणाव आहे. दोन्ही बाजूंकडून लष्करी आणि मुत्सद्दी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र या चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. दोन्ही बाजूचे संबंध विकसित करण्यासाठी बरेच काम झाले आहे, असेही जयशंकर यांनी सांगितले.