नवी दिल्ली – शेतकऱ्यांचे तथाकथित आंदोलन आता शेतकऱ्यांचे राहिलेले नाही. त्या आंदोलनात डाव्या आणि माओवादी घटकांनी घुसखोरी केली आहे, असा दावा केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी शनिवारी केला.
विविध आरोपांवरून अटक करण्यात आलेल्या विचारवंत आणि कार्यकर्त्यांची सुटका करावी, अशी मागणी करणारे फलक शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी झळकले. त्याचा संदर्भ घेऊन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारीच शेतकऱ्यांनी समाजविरोधी घटकांना थारा देऊ नये, असे आवाहन केले होते.
त्यापाठोपाठ गोयल यांनी येथे एक कार्यक्रमात बोलताना आंदोलन शेतकऱ्यांचे राहिले नसल्याचे वक्तव्य केले. देशविरोधी आणि अवैध कारवायांबद्दल गजाआड करण्यात आलेल्यांची सुटका करण्याची असंबद्ध मागणी शेतकरी आंदोलनात होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे.
देशभरातील शेतकऱ्यांच्या लाभासाठीच केंद्रीय कृषी कायदे आणले गेले आहेत. त्या कायद्यांमुळे शेतमालासाठीची किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) व्यवस्था धोक्यात येणार असल्याचे चुकीचे चित्र रंगवले जात आहे, अशी भूमिकाही गोयल यांनी मांडली.