पुणे – सध्याच्या राजकीय स्थितीत भाजपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) नेटाने साथ देतो आहे. या दोघांनाही एकमेकांची गरज आहे. अशावेळी रिपाइंने पुण्याचे उपमहापौरपद भाजपकडे मागितले आहे. रिपाइंला तिसऱ्यांदा उपमहापौरपद देताना महापालिकेत बहुमत असलेल्या भाजपला तडजोडी कराव्या लागतील, अशी चिन्हे आहेत.
भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवले. त्यावेळी शिवसेना, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना यांची भाजपला साथ होती. ही एकजूट पुढे विस्कळीत होत गेली. 2014 मध्ये शिवसेनेने विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवली. निवडणुकीनंतर शिवसेना भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाली.
2019ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रित लढवली. विधानसभेच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना पुन्हा वेगळे झाले. मोदी यांच्या सत्तेच्या पहिल्या सत्रातच राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपपासून दुरावली. अलिकडे बातम्या अशा येत आहेत, की “रासपचे महादेव जानकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली असून या दोन्ही पक्षांत जवळीक वाढते आहे.’
राष्ट्रीय पातळीवरही अकाली दल पक्षाने भाजपची साथ सोडली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशमने भाजपपासून पूर्वीच फारकत घेतली आणि याहीपुढे जाऊन मोदी सरकारविरोधात त्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. हा ठराव संसदेत बहुमताने फेटाळला गेला. बिहारमधील उपेंद्र कुशवाह भाजपला सोडून गेले आणि त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली.
मेघालयातील नेते पी.ए. संगमा यांच्या मुलाने एनपीपी स्वतंत्रपणे लढेल असा निर्णय घेतला. भाजपसाठी मित्रपक्षांचे गणित वजाबाकीचे राहिले आहे. अशा राजकीय स्थितीत रिपाइंने भाजपला भक्कम साथ दिली आहे. संसदेत आणि संसदेबाहेर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोदी सरकारचे वेगवेगळ्या विषयांवर समर्थन केले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपसाठी रिपाइं महत्त्वाचा मित्रपक्ष आहे. मुंबई महापालिकेच्या अटीतटीच्या लढतीत रिपाइंची साथ भाजपला उपयोगी ठरणार आहे. हे पाहता रिपाइंच्या मागणीला भाजप कसा प्रतिसाद देणार ? याकडे अर्थात लक्ष असेल.
पुण्यात कसरत करावी लागणार
पुण्यामध्ये रिपाइंचे पाच नगरसेवक आहेत. त्यातील डॉ. सिद्धार्थ धेंडे, नवनाथ कांबळे यांना उपमहापौर पद मिळाले आहे. (कांबळे यांचे अकाली निधन झाले) 2022 मध्ये महापालिकेची निवडणूक आहे. भाजपचे शंभर नगरसेवक आहेत. त्यातील सर्वांना सामावून घेताना भाजपची कसरत होत आहे. त्यामुळे रिपाइंची मागणी पूर्ण करताना भाजपला कसरत करावी लागेल. राष्ट्रीय पातळीवर मित्रपक्षांना सांभाळून घेण्याची भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. याची दखल पुण्यातील नेत्यांना घ्यावी लागेल. या घडामोडींवर पालिका निवडणुकीची समीकरणे ठरतील.