नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या खूनप्रकरणात पत्रकार बाळासाहेब बोठे संशयित मुख्य सूत्रधार असून, ते पसार झाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली असून, ती शोधासाठी रवाना करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी आज सागर भिंगारदिवे व हृषीकेश पवार या दोघा संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे खुनाच्या कटात सहभागी असलेल्यांची संख्या आता सहा झाली असून, त्यातील पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयावरुन अटक करण्यात आलेल्या सागर भिंगारदिवे व हृषीकेश पवार यांना दुपारनंतर पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (दि. 7) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपासी अधिकारी अजित पाटील यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघाजणांसह आता अटकेतील आरोपींची संख्या पाचवर पोचली आहे.
तसेच आरोपींकडून 6 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघाही संशयित आरोपींना देखील 7 डिसेंबरपर्यंतच पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात सामाजिक कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेने नगर शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रांत मोठीच खळबळ उडाली होती. रेखा जरे यांच्या सॅन्ट्रो कारचा कट लागल्याने मोटारसायकवरून आलेल्या दोघा जणांनी पाठलाग करत जरे यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, घटनेच्यावेळी त्यातील एकाने हल्ला केल्यानंतर मोबाइलवर फोटोही काढला होता. त्यामुळे हा खून असल्याचा संशय त्याचवेळी बळावला होता.
खुनाचे कारण अजूनही अस्पष्ट!
पोलीस तपासात रेखा भाऊसाहेब जरे यांना सुपारी देवून संपविले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघा हल्लेखोरांव्यतिरिक्त आणखी चार जणांचा या कटात सहभाग असल्याचे आज स्पष्ट झाले. चोवीस तासांच्या आत यातील काही आरोपींना अटक करण्यात यश मिळाल्याने गुन्ह्याचा उलगडा होत गेला आहे. तथापि, खुनाचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.