नगर -राज्य सरकारने राज्यातील साखर कामगारांच्या पगार वाढीचा निर्णय घेणाऱ्या त्रिपक्षीय समितीची घोषणा करून, साखर कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने सोमवार (दि.30) पासून घोषणा केलेल्या राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, महासंघाचे सहसचिव आनंदराव वायकर यांनी पुणे येथे पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीसह इतर प्रश्न प्रलंबीत असल्याने संघटनेने बेमुदत संपाचा इशारा दिला होता. राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सहकार व कामगार खात्याने राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय घेण्यासाठी 19 महिने प्रलंबित असलेली त्रिपक्षीय समिती गठित केली आहे. या सरकारच्या निर्णयाचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, महासंघाचे अध्यक्ष पी.के. मुडे, सरचिटणीस सुभाष काकुस्ते, खजिनदार व्ही.एम. पतंगराव, कार्याध्यक्ष शिवाजीराव औटी, उपाध्यक्ष शिवाजी कोठवळ, बी.जी. काटे, सहचिटणीस सत्यवान शिखरे, रामदास राहणे, भाऊसाहेब ऐखंडे, बापुराव नागवडे, शरद नेहे, व्दारकादास दिलवाले, युवराज रणवरे, डी.बी. मोहिते, अशोक बिराजदार, नितीन बेनकर, सचिव राजेंद्र तावरे, सयाजी कदम, प्रदीप शिंदे, कैलास कावळे, संजय मोरबाळे, तसेच आदी उपस्थित होते.