-अमित डोंगरे
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाचे वर्णन पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यानंतर बेजबाबदार व दिशाहीन असेच करावे लागेल.
कोणत्याही मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी देण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असतो. याच बाबतीत भारतीय संघ अपयशी ठरला. इतकेच नव्हे तर दुसरा सामनाही कर्णधार विराट कोहली, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल आणि मयंक आग्रवाल यांच्या अफलातून खेळीनंतरही भारताने गमावला. आता या मालिकेतील तिसरा सामना जिंकून किमान प्रतिष्ठा तरी वाचणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही मालिका तर यजमान संघाने लिलया जिंकत मायदेशातील वर्चस्व कायम राखले.
मार्चपासून जगभरात सुरू झालेल्या करोनाच्या धोक्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दौरा केला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय, तीन टी-20 तसेच चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 374 धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात यजमान संघाची फलंदाजी सरस झाली असे म्हटले जात असले तरीही त्यात भारतीय संघाच्या दिशाहीन गोलंदाजीचा तसेच अत्यंत गचाळ क्षेत्ररक्षणाचाही मोठा वाटा आहे. इतकेच नाही तर कर्णधार विराट कोहलीचे सदोष नेतृत्वही या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. ज्या चूका पहिल्या सामन्यात केल्या त्याचीच पुनरावृत्ती दुसऱ्या सामन्यातही झाली.
ज्या वेळी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व ऍरन फिंच तसेच स्टिव्ह स्मिथ फलंदाजी करत होते, त्यावेळी कोहलीने गोलंदाजीत बदल करणे अत्यावश्यक होते. मात्र, जसप्रीत बुमराह व महंमद शमी साफ अपयशी ठरत असतानाही त्याने हे बदल केले नाहीत. अर्थात, या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणी गोलंदाज बळी मिळवू शकतील, असा विश्वास त्याला वाटला नसेल; पण हेच नेतृत्वाचे अपयश म्हटले पाहिजे. त्याच्या अत्यंत मर्जीतील लेगस्पिन गोलंदाज यजुवेंद्र चहल संघात असतानाही कोहलीने त्याला चेंडू अशा वेळी सोपवला जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना क्रिकेटचा चेंडू फुटबॉल इतक्या आकाराचा दिसू लागला होता. त्यातही वॉर्नर, फिंच यांच्यानंतर ग्लेन मॅक्सवेल व स्टिव्ह स्मिथ यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली त्याला फलंदाजी म्हणणे योग्य नाही. ती धुलाईच होती. आंतरराष्ट्रीय गोलंदाजीची लक्तरे यजमानांनी थेट सिडनीच्या ऑपेरा हाऊसच्या वेशीवर त्यांनी टांगली.
भारताचे प्रमुख गोलंदाज त्यांना मदत करणारे क्षेत्ररक्षक आणि या सर्वांवर नियंत्रण राखणारा कर्णधार कोहली सगळेच दिशाहीन वाटले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना कसे रोखायचे हेच त्यांना उमगत नव्हते. संपूर्ण यष्ट्या कव्हर करून इनसाईट आऊट स्टान्सने फलंदाजी करणारा स्मिथ सातत्याने या ठिकाणी फटकेबाजी करतो हे माहीत असूनही कोहलीने तिथे क्षेत्ररक्षक लावला नव्हता याचेही आश्चर्य वाटते.
डान्सिंग डाऊन द विकेट अशी फलंदाजीची शैली असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना एकेरी धावा काढण्याची जास्त गरजच वाटली नाही इतक्या सोप्या पद्धतीने भारतीय गोलंदाजांनी त्यांना चौकार व षटकारांची रसद पुरवली. भारतीय फलंदाजांनी पहिल्या दोन्ही सामन्यांत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात आक्रमक केली मात्र, कोणत्या चेंडूवर मोठे फटके मारायचे व कोणत्या चेंडूंना आदर दाखवायचा याबाबत आता कोहलीसह सगळ्याच फलंदाजांची शाळा घ्यायला हवी.
पहिला समना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात तरी भारतीय संघ एकदिलाने खेळेल असे वाटले होते. मात्र, मालिका गमावण्याचा धोका असतानाही पहिल्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा बेजबाबदार वृत्तीचे दर्शन घडवले. त्यांना ही एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे टी-20 नव्हे असे समजावून सांगणे गरजेचे आहे.
प्रत्येक चेंडूवर षटकार किंवा चौकार मिळाला नाही तरी एकेरी व दुहेरी धावा काढून धावफलक हलता ठेवणे किती महत्त्वाचे असते याचा साक्षात्कार भारतीय फलंदाजांना कधी होणार असा प्रश्न निर्माण होतो. जवळपास आठ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना ऑस्ट्रेलियाने जी व्यावसायिकता दाखवली ती भारतीय संघ दाखवणार का हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
ही मालिका जरी आपण गमावली असली तरीही वेळ गेलेली नाही. या मालिकेतील अखेरचा सामना तसेच टी-20 सामन्यांची मालिका व कसोटी मालिका बाकी असून त्यात यशस्वी पुनरागमन करण्यासाठी कोहली आणि कंपनीला निश्चितच संधी आहे. मात्र, त्यासाठी गरज आहे ती जबाबदार खेळाची, त्याला समर्पक नेतृत्वाची आणि अत्यंत प्रामाणिक क्षेत्ररक्षणाची.