बालिया – प्रेमाच्या प्रस्तावाला अव्हेरल्याने रागाच्या भरात एका 16 वर्षीय युवतीची तिच्या मैत्रिणींसमोरच गळा चिरून हत्या करणाऱ्या तरूणावर कडक अशा राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा निर्णय बालिया पोलिसांनी घेतला आहे.
सिकंदरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका मुलीची हत्या केल्याच्या आरोपावरून सईद महंमद याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे आझमगढ विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुभाषचंद्र दुबे यांनी सांगितले.
सईदचे या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्यात अपयश आल्यावर त्याने तिची हत्या केली. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे दुबे यांनी सांगितले.
ही मुलगी शेतात भाजी तोडण्यासाठी गेली असता सईदने तिच्यावर शुक्रवारी हल्ला केला. तिच्या मैत्रिणींसमोरच तिची गळा चिरून हत्या केली. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्यापासून देशाला आणि कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचणार नाही याची प्रशासनाला खात्री पटेपर्यंत 12 महिन्यांसाठी पोलिस कोठडीत ठेवता येते.