- खरेदी-विक्रीवर परिणाम : अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज
कामशेत – भात उत्पादनासाठी अग्रेसर असलेल्या मावळ तालुक्यात यंदा अवेळी पावसामुळे उत्पादन व गुणवत्तेवर चांगलाच परिणाम झाला. भाताची गुणवत्ता खालवल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यास अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज असल्याचे चित्र आहे.
यंदा मावळात 12 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे भात खाचरातील उभी पिके आडवी झाली. त्यावरून पाणी वाहिल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता उत्पादन घटल्यानंतर चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र तरीही भाताचा बाजार (भाव) वाढण्याऐवशी घटला. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे पाहवयास मिळत आहे. एकीकडे तांदळाच्या पिकामध्ये मोड अधिक असल्यामुळे गुणवत्ताही ढासळल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे.
मागील वर्षी इंद्रायणी भातास 2200 ते 2400 रुपये प्रति क्विंटल असा दर होता, तर यावर्षी 2000 ते 2500 प्रति क्विंटल एवढा दर आहे, तसेच कोळंब जातीच्या भातास मागील वर्षी 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटलचा भाव होता. तो यावर्षी 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव आहे आणि आंबेमोहोर भाताचा दर मागील वर्षी 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटल असा होता, तो यावर्षी वाढून 3000 ते 3500 रुपये प्रति क्विंटल झाला आहे.
यावर्षी परतीच्या पावसामुळे उत्पादनात फार घट झाली. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे देखील अवघड झाले आहे. त्यात भाताची गुणवत्ता ढासळल्याने इंद्रायणीची मागणी कमी होताना दिसत आहे, यामुळे देखील भाव स्थिर राहिल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र यावर्षी उत्पादनात घट होऊन देखील भाव वाढण्या ऐवजी कमी झाले असल्याने शेतकऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांच्या विषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
शासनाची भात पिकास 1800 ते 1868 प्रति क्विंटल एव्हडी आधारभूत किंमत ठरविली असल्याने व्यापारी देत असलेला भाव हा आधारभूत किमतीपेक्षा जास्त असल्याने व्यापाऱ्यांना दरासंदर्भात शेतकऱ्यांना काही बोलता येत नाही. पण भात पिकाची प्रतवारी कशी करावी व त्याची गुणवत्ता कशी तपासली जावी याविषयी शासनाने व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नियम व अटी लावत नसल्याने व्यापारी म्हणेल तीच गुणवत्ता शेतकऱ्यांना मान्य करून आपले धान्य विकावे लागत आहे; यामुळे भात पिकाचा दर्जा व गुणवत्ता ठरविण्याची एक नियामक पद्धत शासनाने अवलंबवण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
व्यापारी घेताहेत फायदा
मावळातील भातपीक हे प्रमुख पीक आहे, या पिकाची विक्री केल्यानंतरच हंगामी पिके घेण्यासाठी शेतकरी भांडवलाची निर्मिती करीत असतात. यामुळेच शेतकऱ्यांना धान्य विकण्याची घाई असल्याने याचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे.
“इंद्रायणी’चा दरवळ घटला
साधारणत: गतवर्षी शंभर किलो भाताला (साळ) 65 किलो तांदूळ आणि चार-पाच किलो कणी पडते. यंदा मात्र शंभर किलो भाताला 50 किलो तांदूळ पडतो, 20 किलो कणी पडते. अवकाळी पावसामुळे खाली पडलेला भात तांबुस होतो. तसेच भात भरडल्यानंतर कणी अधिक पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.
यंदा भातपीक काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. भाताची गुणवत्ता खलविल्याने तांदळाची मोड अधिक होत असल्याने शेतकऱ्यांना कमी बाजार मिळत आहे.
– विलास पितानी, तांदळाचे व्यापारी.यंदा भात काढण्याचे वेळी अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पावसामुळे झालेल्या नुकसानीतून शिल्लक पीक हाती लागले. त्याला देखील योग्य बाजारभाव मिळत नसल्याने यावर्षी भात उत्पादक शेतकरी घाट्यात गेला आहे.
– रमेश भुरुक, शेतकरी, गोवित्री.