औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराजवळील एका गावात एका कुटुंबावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. त्यात हे चार जणांच कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला गेला. तथापि त्यात तीन जण ठार झाले असून एक सहा वर्षाचा मुलगा मात्र वाचला आहे.
एक दाम्पत्य आणि त्यांची दहा वर्षाची मुलगी असे तीन जण यात ठार झाले आहेत. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार मारण्यात आले आहे. पैठण जवळील कावसन गावात हा प्रकार घडला. त्यात राजु निवरे (वय 35), त्यांची पत्नी अश्विनी निवरे (वय 30), आणि त्यांची कन्या सायली (वय 10) हे तिघे जण ठार झाले आहेत.
या दाम्पत्याचा सोहम नावाचा एक सहा वर्षाचा मुलगा मात्र वाचला असला तरी तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर औरंगाबादच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही हत्या चोरीच्या आरोपावरून झाली नाही असे परिस्थितीनुसार दिसून आलेले आहे. मात्र हत्येचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. पोलिसांनी तपास काम सुरू केले आहे.