नवी दिल्ली – केरळ सोने तस्करीप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने आज केरळमधील पाच ठिकाणी छापे घातले. “एनआयए’च्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद असलम, अब्दुल लतीफ, नझरुद्दीन शा, रमझान पी आणि मोहम्मद मन्सूर यांच्याशी संबंधित ठिकाणांवर हे छापे घातले गेले.
या आरोपींनी याप्रकरणी आगोदरच अटक करण्यात आलेल्या आरोपींबरोबर संगनमत करून सोन्याच्या तस्करीची सोय करत असत. संयुक्त अरब अमिरातीच्या दूतावासाच्या मदतीने आयात आणि त्याच्या विल्हेवाटीबाबतची व्यवस्था हे आरोपी करत असत, असे “एनआयए’ने सांगितले.
“एनआयए’ने घातलेल्या छाप्यांदरम्यान काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कागदपत्रे हस्तगत केली गेली, असे प्रवक्त्याने संगितले. “एनआयए’ने या प्रकरणात आतापर्यंत 21 लोकांना अटक केली आहे.
त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 जुलै रोजी 14.82 कोटी रुपयांचे 30 किलो सोने जप्त केले गेले होते. हे सामान चेन्नईमधील यूएईच्या दूतावासाच्या नावाने मालवाहू विमानातून पाठवण्यात आले होते. त्यानंतर सोने तस्करीचे हे मोठे प्रकरण उघडकीस आले होते.