मेलबर्न/नवी दिल्ली – भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेत, पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली भारतात परतणार असून आपल्या पहिल्या-वहिल्या बाळाच्या जन्माचा आनंद त्याला घ्यायचा आहे. आक्रमक फलंदाज कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ दुबळा होईल, की भारताचा मालिकेत वरचष्माच राहील, याविषयी चर्चेला तोंड फुटले असून, कोहलीने व्यक्तीगत कौटुंबिक आनंदापेक्षा त्याने देशहिताला प्राधान्य द्यायला नको होते का, अशाही चर्चा आता झडत आहेत.
इंटरनेटसह सोशल माडियामध्ये कोहलीच्या अनुपस्थितीवरुन दोन गट पडले असून, एका गटाच्या मते, आपले वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक जीवन यातून निवड करायचा अधिकार कोहलीला आहे; तर दुसऱ्या गटाच्या मते, कोहलीने व्यक्तिगत आनंदापेक्षा देशासाठी खेळण्याला प्राधान्य देणे हेच त्याचे कर्तव्य असल्याच्या कानपिचक्या दिल्या आहेत.
दुसरीकडे, विविध खेळाडूंनाही आता यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केल्याने, पुढील काही दिवस या विषयावर आणखी चर्वितचर्वण होण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाचा निवृत्त क्रिकेटपटू नाथन लियॉनने म्हटले आहे की, पहिल्या कसोटी सामन्यानंतर कोहली भारतीय संघात नसेल, ही भारतासाठी नक्कीच काळजीची बाब आहे. मात्र, कोहली नाही म्हणून भारतीय संघ दुबळा होईल, असे मात्र म्हणता येणार नाही. कोहलीच्या अनुपस्थितीतही भारताच्या चमकदार कामगिरीची अपेक्षा आम्ही ठेवून आहोत. शिवाय कोहली नाही, म्हणून ऑस्ट्रेलियन संघानेही हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. भारताची फलंदाजी खोलवर असून त्यांच्या गोलंदाजीतही विविधता आहेच.
लियॉनने म्हटले आहे की, कोणत्याही सर्वोच्च स्थानावरील संघाला तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याशी झुंजताना जास्त आनंद मिळत असतो. स्टीव्ह स्मिथ आणि मार्कस लुबेनशेप्रमाणेच कोहली आताचा स्टार क्रिकेटर आहे. त्यामुळे तो तीन सामन्यांत नसणे हे दु:खदायकच असेल. तरीही भारताचे अन्य खेळाडू शक्यतो कोहलीची अनुपस्थिती जाणवू देणार नाहीत, अशी आशा आहे.
ऑस्ट्रेलियाचा आणखी एक निवृत्त खेळाडू जस्टीन लॅंगर कोहलीच्या समर्थनार्थ पुढे आला असून, आपल्या वैयक्तीक जीवनातील आनंदाला कोहली जर प्राधान्य देऊ इच्छित असेल, तर आपण सर्वांनी त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. कोहलीही आपल्यासारखाच माणूस असून, त्याच्या भावभावनांनाही त्याच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान का असू नये, असे म्हटले आहे.
इंटरनेटवरही जोरदार चर्चा…
विराटसारख्या देशाच्या रोल मॉडल असलेल्या स्टार खेळाडूने राष्ट्रीय कर्तव्यासमोर कौटुंबिय गोष्टींना अधिक प्राधान्य दिल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत टीका केली आहे. त्यापैकी अनेकांनी त्याला धोनीची आठवण करून देत धोनीने कन्या झिवाच्या जन्मादरम्यान विशेष रजा न घेता संघासोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याची आठवण करून दिली.
आपण आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करत असून मी इतर कोणत्याही गोष्टींचा विचार करु शकत नाही. आमच्यासाठी विश्वचषक स्पर्धा खूप महत्त्वाची आहे, असे धोनीने त्यावेळी सांगितल्याची एकाने आठवण करून दिली. तर विराट समर्थकांनी धोनी आणि विराटमध्ये अशी तुलना कऱणे चुकीचे असून त्याला त्याचे वैयक्तिक आयुष्य आहे असे म्हणत पाठिंबा दर्शविला आहे.
रोहितनेही आपल्या मुलीच्या जन्माच्यावेळी अशीच रजा घेतली होती. धोनीने दौऱ्याच्या मध्यावर निवृत्ती स्वीकारली होती. त्यामुळे ते त्यांचे खाजगी आयुष्य असून प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे असेही काहींनी ट्विट करून विराटला पाठिंबा दर्शविला आहे.