सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये सात करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शुक्रवारी दिली. जिल्ह्यात पावसाळा संपल्यापासून बाधितांचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) कमी आला आहे; परंतु करोनामुळे रोज जाणारे बळी रोखण्यात प्रशासन व आरोग्य विभागाला तितकेसे यश आलेले दिसत नाही.
त्याची कारणे शोधून ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1592 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना धोडोशी, ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, रोहोट, ता. सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, पिरवाडी, ता. सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, दिघंची, ता. आटपाडी (जि. सांगली) येथील 88 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना वडूज, ता. खटाव येथील 67 वर्षीय पुरुष, मुळीकवाडी, ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, उंब्रज, ता. कराड येथील 75 वर्षीय महिला, अशा एकूण सात बाधितांचा मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.