मुंबई – राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 99 हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 190 घटनांचा समावेश आहे. त्यात 686 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.22 मार्च ते 7 मे या कालावधीत कलम 188 नुसार 98,774 गुन्हे नोंद झाले असून 19,082 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 66 लाख 31 हजार 794 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या 100 नंबरवर अनेक तक्रारींसाठी 86,246 फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाइन असा शिक्का आहे अशा 653 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 2,26,236 व्यक्ती क्वारंटाइन आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत 3,15,434 पास देण्यात आले आहेत.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1286 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 54,148 वाहने जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.