पुणे – 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर, जि. जळगाव येथे होणार असून, स्थळ निवडीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने रविवारी हा निर्णय घेतला. स्थळ निवडीसाठी “अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’च्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनीताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक यांची समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीने औदुंबर जि. सांगली आणि अंमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन स्थळ पाहणी केली. तसेच सातारा येथील संस्थेचे दृकश्राव्य सादरीकरण पाहिले. शिवाय तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळ निवड समितीने सर्वानुमते अंमळनेर येथील “मराठी वाङ्मय मंडळ’ या संस्थेची शिफारस केली.
महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या बैठकीत स्थळ निवड समितीखेरीज प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के. आकरे, प्रकाश गर्गे आदी सदस्य उपस्थित होते.
साने गुरुजी यांच्या वाङमयीन कर्मभूमीत हे संमेलन 50 च्या दशकानंतर पाहिल्यांदाच होत आहे. अंमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकासाची मोठी परंपरा आहे. सर्वांच्या सहकार्याने अंमळनेर येथील मराठी वाङमय मंडळ 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जबाबदारी पेलण्यास सक्षम आहे. संमेलन नक्कीच यशस्वी होईल.
– डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष, मराठी वाङमय मंडळ, अमळनेर