गोंदवले (प्रतिनिधी) – मुंबई व पुणे शहरांसह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील नागरीक नियम पाळताना दिसून येत आहेत. मात्र, मुंबई ,पुण्याहून आलेले नागरीक सुट्टीवर आल्याप्रमाणे हौसमौज करण्यासाठी घरातून बाहेर पडत आहेत. त्यांनी स्वतःबरोबरच गावकऱ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी नियमांचे पालन करत घरातच राहणे गरजेचे असताना ते पालन करत नसल्याने अशा लोकांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात 82 गुन्हे दाखल केले आहेत. यात बहुतांश मुंबई ,पुण्याचेच लोक आहेत. त्यामुळे मुंबई, पुणेकरांनो सावधान… घरातून बाहेर पडून हौसमौज, पार्ट्या, भांडणतंटे टाळा अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा, असा इशाराच दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आर. पी. भुजबळ यांनी दिला आहे.
भुजबळ म्हणाले,”मुंबई ,पुणे आदी ठिकाणी कामानिमित्त असलेले बहुतांश माणदेशींनी लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावाला येणे पसंत केले. कोण गाड्या सुरू असताना आले तर काही जण लपूनछपून आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई, पुण्याहून आलेल्या अनेक नागरिकांना दहिवडी, म्हसवड या ठिकाणी तर काहींना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र, जे गावात राहिलेत ते नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. कोण चारचौघांना जमवत चौकाचौकात गप्पा मारत, शिवारातून पार्ट्याही करत आहेत.
काहीजण वेळ मिळालाय म्हणून जमीन ,घराच्या कारणावरून भांडणे काढत आहेत. अशा तक्रारी पोलीसांकडे येऊ लागल्या आहेत. यात बहुतेक करून मुंबई, पुण्याचीच लोकं दिसून येत आहेत.’ ही वेळ भांडण तंटे, हौसमौज, पार्ट्या करण्याची नसून जीवावर बेतत असलेल्या करोनाला थांबवण्यासाठी घरात राहण्याची आहे. गावकऱ्यांना व प्रशासनाला अशा बाहेरून आलेल्या नागरिकांनी घरात बसून सहकार्य करणे गरजेचे आहे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.