अपघातात झाला होता मृत्यू ः टॅंकरमालक, विमा कंपनीविरोधातील दावा फेटाळला
पुणे – अपघातात मृत्यू झालेल्या चालकाच्या कुटुंबीयांना 8 लाख 80 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याच्या आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य एस. आर. तांबोळी यांनी दिला आहे. चालक काम करत असलेल्या कारच्या मालकाला ही भरपाई द्यावी लागणार आहे. अपघातातील टॅंकर मालक आणि विमा कंपनीविरोधातील अर्ज फेटाळण्यात आला आहे.
माधव, पत्नी माधवी (नाव बदललेले) आणि इतर चौघेजण 5 मार्च रोजी 2012 रोजी इंडिका कारमधून नातेपुते ते फलटण असा प्रवास करत होते. माधव हे गाडी चालवत होते. त्यावेळी माळशिरस तालुक्यातील मोरोची येथे समोरून आलेल्या टॅंकर आणि कारची धडक झाली. त्यामध्ये चालक माधव यांच्यासह अन्य चौघांचा मृत्यू झाला. एकमेव माधवी वाचल्या. या प्रकरणात नातेपुते पोलीस घटनास्थळी गेले.
त्यानंतर मृत माधव यांच्याविरोधात रॉंग साइडने येत अपघातास जबाबदार असल्याचे सांगत गुन्हा नोंदवला. त्यामुळे माधवी आणि तीन मुलांनी मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला. गुन्हा चुकीच्या पद्धतीने नोंदवला आहे. मृताल दरमहा 8 हजार रुपये पगार होता. अवलंबून असलेल्या व्यक्तीचा विचार करून व्याजासह 15 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, यासाठी टॅंकर कंपनी, टॅंकरची विमा कंपनी असलेली आणि कारमालकाच्या विरोधात हा दावा दाखल केला होता.
नोटीस बजावूनही कारमालकाच्या वतीने कोणीही न्यायालयात हजर राहिले नाही. टॅंकर मालकच्या वतीने ऍड. सुदीप केंजळकर आणि विमा कंपनीच्या वतीने ऍड. जी. टी. ढोबळे न्यायालयात हजर झाले. टॅंकर चालक डाव्या बाजूने व्यवस्थित चालला होता. माधव वेगाने गाडी चालवत होता. नियंत्रण सुटल्याने दुभाजकाच्या पलीकडे जाऊन त्याची धडक टॅंकरला बसली. टॅंकरच्या क्लिनर बाजूला बसलेल्या धडकेच्या खुणेवरून तसेच अपघातावरून गाडी ज्या ठिकाणी होती, त्यावरून दिसून येते. टॅंकरला विमा होता.
टॅंकर चालकाकडे परवाना होता. त्याने कोणताही नियम मोडला नाही.अपघातात टॅंकरची चूक असल्याचे सिद्ध होत नाही. याविरोधात माधवीच्या उलट तपासणीमध्ये माधव यांना डावा पाय गुडघ्यापासून खाली नसल्याचे मान्य केले. त्यामुळे टॅंकरच्या मालकाच्या विरोधातील दावा फेटाळण्याची ऍड. केंजळकर यांनी केली. यावर न्यायालयाने जरी इंडिका कार माधव चालवत होता, तरीही तो मालकाकडून त्याचे कुटुंबीय नुकसान भरपाई घेण्यास पात्र आहेत, असा निष्कर्ष काढत वरील आदेश दिला. दरम्यान, या प्रकरणातील आणखी दोन मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख 6 हजार 800 रुपये देण्याचा आदेश झाला आहे.